स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? अनेकांना अनेकदा हेच माहिती नसते अथवा बऱ्याच वेळा अनेकांचा हाच मोठा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC . तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असत. आता ही पदभरती करायची कशी? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात दिली जाते. या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या सर्व उमेदवारांमधून त्या त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात!
त्यापैकी काही मुख्य स्पर्धा परीक्षा :-
- युपीएससी
- एमपीएससी
- स्टाफ सिलेक्शन
- बँकिंग
- रेल्वे
- पोस्ट
- संरक्षण दल
- एलआयसी, इत्यादी.
स्पर्धा परीक्षेची तयारी?
विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि वेगवेगळ्या शासकीय सेवांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परीक्षांची काठिण्य पातळी अधिक वाढवण्यात आली आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी, बारावीपासून केली तर लवकर यश मिळवणे शक्य होते.
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकांना चार ते पाच वेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. बरेच विद्यार्थी बारावीनंतर चार-पाच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे त्यांची तयारी उशिरा सुरू होते व पुढे परत चार-पाच वर्षे अभ्यासात गेल्याने ते लवकर यश संपादन करू शकत नाहीत. बी.ए.बी.कॉम, बी.एस्सी. यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजा दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमास सुरुवात केली तर पदवी होईपर्यंत विद्यार्थ्यांचा जवळपास 50 टक्के स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण झालेला असेल व असे विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होतात. जे विद्यार्थी कमी वयात अधिकारी होतील ते सहजपणे सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतात.
नेमकी तयारी कशी करावी
दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी असा प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नेहमीच पडतो. जे विद्यार्थी दहावी, बारावीला आहेत. त्यांनी उन्हाळ्याच्या सुटीत जर एम.पी.एस.सी. किंवा यु.पी.एस.सी.साठी घेण्यात येणाऱ्या फाऊंडेशन कोर्सला प्रवेश घेतला तर त्यांना योग्य दिशा मिळू शकेल. यानंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत जे उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यशस्वी उमेदवारांची मार्गदर्शनपर व्याख्याने ऐकावीत. त्यांची विविध मासिके, वर्तमानपत्रे, अनियतकालिके यामधून प्रकाशित झालेल्या मुलाखती वाचाव्यात. यु.पी.एस.सी. परीक्षेसाठी ही परीक्षा नेमकी काय असते, यावर ‘आयएएस प्लॅनर’ व एमपीएससीसाठी ‘एमपीएससी प्लॅनर’ ही दोन पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती वाचून काढावी. यामुळे या परीक्षासंदर्भातील आपल्या सर्व शंका दूर होतील.
स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन (जनरल नॉलेज) या विषयावर अधिकाधिक प्रश्न पूर्वपरीक्षेपासून मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत विचारले जातात. त्यामुळे सामान्य अध्ययन या घटकासाठी पाचवी ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन केले पाहिजे. विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सराव केला पाहिजे. वर्तमानपत्रातील क्रीडा घडामोडींशी संबंधित पान वाचून त्याच्या नोंदी कराव्यात. लोकराज्य, योजना, यशदा-यशमंथन, कुरुक्षेत्र ही मासिके नित्यनियमाने वाचायला हवीत. वर्तमानपत्रे ही सामान्य अध्ययनासाठी त्याचबरोबर निबंधासाठी व मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयांसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. साधारणत: वर्तमानपत्राचा या परीक्षांसाठी 20 ते 25 टक्के वाटा आहे म्हणून लहानपणापासून मुलांना वर्तमानपत्रे वाचण्याबाबत प्रवृत्त केले पाहिजे. दूरचित्रवाहिन्या व आकाशवाणीवरील मराठी व इंग्रजी बातम्याही दररोज ऐकायला हव्यात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा